रेल्वे यार्ड डब्यास आग

शहरात आगींचा उपद्रव सुरू असतानाच मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील यार्डात दुपारी २.५० च्या सुमारास लांब पल्ल्याच्या एका रिकाम्या डब्यास अचानक आग लागली. या आगीने निर्माण झालेला धुराचा लोळ आसमंतात पसरल्याने भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली

शहरात आगींचा उपद्रव सुरू असतानाच मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील यार्डात दुपारी २.५० च्या सुमारास लांब पल्ल्याच्या एका रिकाम्या डब्यास अचानक आग लागली. या आगीने निर्माण झालेला धुराचा लोळ आसमंतात पसरल्याने भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून अग्निशमन दलाने पाऊण तासात ही आग आटोक्यात आणली. या आगीची कारणे शोधण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही आग लागण्यामागे घातपातासह अन्य सर्व कारणांचा तपास केला जाणार आहे.

अग्निशमन दलाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यास रेल्वेला पाऊण तास लागला. यात कोणतीही जिवितहानी झाली नसली, तरीही यार्डात उभ्या असणाऱ्या लांब पल्ल्याच्या किंवा लोकल गाड्यांच्या डब्यांना आग लागतेच कशी, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दहाजवळील पुढील काही अंतरावर असणाऱ्या यार्डात दोन एसी आणि एक स्लीपर श्रेणीचा डबा होता. अतिरिक्त असणाऱ्या डब्यात अचानक आग लागली आणि धूर धुमसू लागला. ही आग वाढत गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान ३.१५ च्या सुमारास तिथे पोहोचले. या ठिकाणी येण्यासाठी दलास प्लॅटफॉर्म क्रमांक १८ येथून यावे लागले. ही आग विझवताना त्याची झळ अन्य डब्यांना बसू नये यासाठी इथले दोन्ही एसी डबे तिथून हलवण्यात आल्याने त्याची कोणतीही हानी झाली नाही. त्याचप्रमाणे तिथल्या ओव्हरहेड वायरमधील विद्युतप्रवाह लगेचच थांबवण्यात आला.

या आगीत स्लीपरचा डबा पूर्णपणे खाक झाला असून सुरक्षिततेसाठी दुपारी ४.३० पर्यंत ओव्हरहेड वायरमधील प्रवाह खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे कोणार्क, कन्याकुमारी, प्रगती, नंदीग्राम एक्स्प्रेस दहा-पंधरा मिनिटांपासून सव्वा तास उशीराने सुटल्या.

हा डबा सेवेत नव्हता

बंद असणारा हा डबा सेवेत नव्हता. अतिरिक्त असणाऱ्या या डब्यास नेमकी आग कशाने लागली हे तपासले जाणार आहे. त्यासाठी फॉरेन्सिकचीही मदत घेतली जाणार आहे.

रेल्वे यार्ड असुरक्षित?

रेल्वेचे यार्डचा भाग खुला असून तिथे कोणीही ये-जा करू शकते. यार्डात शिरण्यासाठी अनेक मार्ग असल्याने प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे शक्य नाही. त्यातूनच एखादवेळेस यार्डात उभ्या असणाऱ्या गाड्यांमधील डब्यांमध्ये आग लागण्यासारख्या दुर्घटना घडू शकतात. अशात गर्दुल्ला वा अन्य तत्सम कोणीही शिरकाव करू शकतो, असे धक्कादायक विधान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी मंगळवारी सीएसएमटी येथे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *