बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला सहा विषयांचीच परीक्षा

बीकॉमच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, यावर्षी या विद्यार्थ्यांना सहा विषयांचीच परीक्षा द्यावी लागणार आहे. यामुळे सहा विषयांची परीक्षा देणारी ही पहिली बॅच ठरणार आहे. विद्यापीठावर येणारा उत्तरपत्रिका मूल्यांकनाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

बीकॉमच्या तीन वर्षांमध्ये एकूण २० विषयांचा अभ्यास करणे आवश्यक असते. यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रथम वर्षात सात, दुसऱ्या वर्षात सहा आणि तिसऱ्या वर्षात सात विषयांची परीक्षा होत असे. मात्र, शेवटच्या वर्षाच्या सर्व उत्तरपत्रिका या विद्यापीठाकडे तपासणीसाठी जात असल्याने परीक्षा विभागावर मोठा ताण येतो. यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ न देता शेवटच्या वर्षातील ‘मॅनेजमेंट अकाऊंटिंग अँड कॉस्टिंग’ हा विषय दुसऱ्या वर्षात शिकविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, असे ‘कॉमर्स’चे डीन सिद्धेश्वर गडधे यांनी सांगितले. यामुळे नवीन पद्धतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या वर्षांत सात आणि शेवटच्या वर्षात सहा विषय शिकवले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९मध्ये शेवटच्या वर्षात येणारे विद्यार्थी हे ‘फायनान्शिअल अकाऊंटिंग’, कॉस्टिंग, इकॉनॉमिक्स, एमएचआरए हे चार मुख्य विषय व अप्लाइड कॉम्पोनंटमधील दोन अशा सहा विषयांची परीक्षा देतील. पूर्ण १०० गुणांची परीक्षा देणारीही ही पहिलीच बॅच असेल. परीक्षेचे यापूर्वीचे ७५:२५ हे सूत्र काढून पूर्ण १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती घनश्यामदास सराफ कॉलेजातील प्राध्यापक जयंत आपटे यांनी दिली. यामुळे या विद्यार्थ्यांना ६०० पैकी गुण दिले जाणार आहेत.

अभ्यासक्रमात ‘जीएसटी’

टीवाय बीकॉमच्या अभ्यासक्रमातही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, यामध्ये ‘जीएसटी’चा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण ‘जीएसटी’ शिकविणे शक्य नाही. तसेच, त्यातील सातत्यपूर्ण बदलांमुळे पुस्तकातील त्याचे संदर्भ कायम राहतील असे नाही. यामुळे ‘जीएसटी’च्या मूळ संकल्पना अभ्यासक्रमात शिकविल्या जाणार असून, त्यावर आधारित परीक्षाही होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *