वटवाघळांपासून लांब राहा!

केरळ राज्यातील कोझिकोडे जिल्ह्यात काही भागांमध्ये झालेल्या ‘निपाह’ विषाणूंच्या संसर्गामुळे मृत्यूने थैमान घातले आहे. मात्र, या विषाणूच्या संसर्गाने पुणे आणि महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाऊ नये. हजारो वटवाघळांपैकी मोजक्याच वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. विषाणूच्या संपर्कात मानव आल्यास त्याच्यामार्फत दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची भीती असून त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केले.

‘निपाह’ विषाणूच्या संसर्गाबाबत गैरससमजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याबाबत ‘एनआयव्ही’चे संचालक डॉ. देवेंद्र मौर्या यांनी  माहिती दिली. ‘केरळमध्ये वटवाघळांना संसर्ग झालेल्या ‘निपाह’ या विषाणूमुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू प्रामुख्याने फळांच्या झाडावर असलेल्या हजारो वटवाघळांपैकी (बॅट्स) मोजक्याच काही वटवाघळांमध्ये दिसून येतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याबाबत गैरसमजदेखील असायला नकोत,’ असा सल्ला डॉ. मौर्या यांनी दिला. ‘झाडावर लटकणाऱ्या वटवाघळांच्या मूत्रांद्वारे या विषाणूचा प्रसार होऊन संसर्ग होतो. गावांपासून ते शहरात सर्वत्र वटवाघळे असतात. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. मानवाला विषाणूंचा संसर्ग प्रामुख्याने डोळे, नाक, तोंडाद्वारे होण्याची शक्यता असते. झाडावर लटकणाऱ्या सर्वच वटवाघळांपासून विषाणूंचा संसर्ग होत नाही. ‘निपाह’ विषाणूचा ‘स्वाइन फ्लू’सारखा वेगाने संसर्ग होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही. मात्र ‘स्वाइन फ्लू’च्या तुलनेत ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,’ असे आवाहन डॉ. मौर्या यांनी केले.

एका वटवाघळाकडून दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही. एका वटवाघळाला विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये ‘अॅन्टीबॉडीज’ तयार होतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होत नसल्याने सर्वच वटवाघळांमध्ये विषाणू असतो, असे समजू नये. मोजक्याच वटवाघळांमध्ये विषाणूचा संसर्ग होत असल्याने त्याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत, याकडे डॉ. मौर्या यांनी लक्ष वेधले.

 वटवाघळांचा शोध घेऊ नका

विषाणूंचा संसर्ग झालेली वटवाघळे आकाराने मोठी असतात. मंदिरे, विहिरी, गुहांमध्ये मोठ्या प्रमाणात वटवाघळे आढळतात. त्या वटवाघळांचा आकार लहान असतो. या ठिकाणी आढळणाऱ्या वटवाघळांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी घाबरून जाऊ नये. तसेच विनाकारण वटवाघळांचा शोध घेऊ नये. वटवाघळांच्या सान्निध्यात मनुष्य आल्यास त्यामुळे मानवाला संसर्ग होण्याची भीती असते.

”ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. यासारख्या लक्षणांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सना विषाणूची माहिती नसल्यास त्यांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. वटवाघळांमध्ये ‘निपाह’ विषाणू कोठून आला, त्याचा संसर्ग कसा झाला, या संदर्भात केंद्रीय आरोग्य पथकामार्फत अभ्यास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *