प्लास्टिक बंदीच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करावा, या उद्देशातून समर्थ भारत आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी मिळून कापडी पिशवी बँक हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. शहरातील शंभर सोसायटय़ांध्ये प्राथमिक टप्प्यावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून नंतर त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनपासून कापडी पिशवी बँक या उपक्रमाचा प्रारंभ होत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केल्याच्या पाश्र्वभूमीवर प्लास्टिक निर्मूलनाचा भाग म्हणूनही हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती समर्थ भारत संस्थेच्या पर्यावरण विभागाचे संयोजक नीलेश फाटक यांनी दिली. खरं तर, कापडी पिशवी बँक ही लोकांसाठी लोकांनी चालविलेली लोकांचीच चळवळ असेल. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ५० स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी होत असून समर्थ भारत संस्था या सर्व उपक्रमामध्ये माध्यम म्हणून काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘आपल्या शहराला प्लास्टिकमुक्त करू या आणि आपल्या सोसायटीत कापडी पिशवी बँक करू या’ हे ब्रीद घेऊन ही चळवळ काम करेल, असे सांगून फाटक म्हणाले, सोसायटीमध्ये बाहेर जाताना वस्तू खरेदीसाठी कापडी पिशवी बँकेतून पिशवी घेऊन जाणे आणि वापर झाल्यानंतर परत बँकेमध्ये जमा करणे. या बँकेमध्ये विविध आकाराच्या किमान ५० पिशव्या असाव्यात. या पिशव्या सोसायटीतील सभासदांनी देणगी रूपाने द्याव्यात किंवा महिला बचत गटांमार्फत तयार केलेल्या पिशव्या सोसायटीने विकत घ्याव्यात. विविध सोसायटय़ांमध्ये जाऊन या उपक्रमाची माहिती देत सभासदांना महत्त्व पटवून देण्याचे काम सध्या सुरू आहे. सोसायटीच्या पार्किंगच्या जागेत किंवा प्रवेशद्वारापाशी कापडी पिशवी बँक सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. ५ जून रोजी शंभर सोसायटय़ांमध्ये कापडी पिशवी बँक सुरू करण्याचा मानस आहे. हा उपक्रम त्या दिवसापुरता मर्यादित न ठेवता पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
