किसान सभा पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात

अनवाणी पायाने मुंबईत शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. अधिकाऱ्यांनी अजून मागण्यांची साधी दखलही घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक पवित्र्यात आहे.

वन हक्क दावे निकाली काढा, वन पट्ट्यांची मोजणी करा, यांसह विविध मागण्या घेऊन किसान सभेचा मोर्चा मुंबईत धडकला होता. त्या घटनेला आज बरोबर दोन महिने पूर्ण झाले आहेत.

प्रलंबित दावे तत्काळ निकाली काढण्याचं आश्वासन देऊन 13 मार्च रोजी सरकारने  विराट लाल वादळाला माघारी पाठवलं. नाशिकच्या पेठ तालुक्यातून साधारणतः 1500 आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा आहे.

गेल्या दोन महिन्यात आदिवासी बांधव त्यांच्या कामाला लागले, गृहिणी दैनंदिन कामात व्यस्त झाल्यात, तर पुरुषांची रोजगारासाठी भटकंती सुरू झाली. पायांना फोड येईपर्यंत, उन्हाचे चटके सहन करुन कसलीही तमा न बाळगता लाल वादळ मुंबईत धडकल होतं, मात्र त्याचा उपयोग काहीच झाला नाही.

गावात ना मोजणी सुरु आहे, ना सरकारी अधिकाऱ्यांनी संपर्क साधलाय, त्यामुळेच पुन्हा एकदा लढाईचा निर्धार आदिवासी बांधवांनी केला आहे.

मागण्या काय आहेत?

-संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न

-कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात

-शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या

-शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

-स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा

-वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा

-पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *