मृत बहीण स्वप्नात येत असल्याने आकांक्षा अजयकुमार गुप्ता (१६) या मुलीने जाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दाभ्यातील भिवसनखोरी भागात उघडकीस आली.
एक वर्षापूर्वी आकांक्षाची बहीण ज्योती हिने दिल्ली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आकांक्षाला ज्योतीचे स्वप्न पडायचे. ‘तू लाल साडी घेऊन माझ्याजवळ ये’, असे ज्योती तिला म्हणायची, असे आकांक्षाचे म्हणणे होते. त्यामुळे ती तणावात होती. २७ मार्चला अंगावर रॉकेल ओतून आकांक्षाने जाळून घेतले. मेयो हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होता. उपचारादरम्यान आकांक्षाने मृत्युपूर्वी बयाणात बहीण स्वप्नात येत असल्याचे तिने सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आकांक्षाच्या मृत्युप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
