दुषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू

मलनिस्सारण वाहिनीचे पाणी सुमारे ८० वर्षे जुन्या विहिरीत गेल्याने या दुषित पाण्यामुळे शेकडो माशांच्या मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी याच विहिरीतील गप्पी मासे पालिकेचे कर्मचारी इतर ठिकाणी नेत असल्याचे विहिरीचे मालक अभिनय जोशी यांनी सांगितले. मात्र, मलनिस्सारण वाहिनीच्या दुरुस्तीसाठी पत्र व्यवहार करण्यात आला असतानाही अद्याप पालिकेकडून कारवाई करण्यात आली नसल्याची खंत जोशी यांनी व्यक्त केली.

ठाण्यातील स्टेशन रोडवर सुभाष पथ भागात अभिनय जोशी यांचा वाडा आहे. या वाड्यात १९३२ साली विहीर बांधण्यात आली होती. या विहिरीच्या पाण्याचा वापर अभिनय जोशी यांच्यासह येथे राहणारे अनेकजण करतात. या विहिरीत शेकडो गप्पी मासे तसेच सात गोल्ड फिश होत्या. मात्र, परिसरातील मलनिस्सारण वाहिनीचे पाणी विहिरीत गेल्याने या दुषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा दावा जोशी यांनी केला आहे.

काही महिन्यांपूर्वी या मार्गावर ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरण केले होते. येथील रहिवाशांची स्वच्छतागृहाची जोडणी पालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीशी जोडण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ही वाहिनी अनेक कारणांनी तुंबत असल्याचे रहिवाशांना लक्षात आले. मात्र, तक्रार केल्यानंतर पालिकेकडून या वाहिनीची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत होती. ३१ जानेवारीला या वाहिनीतील घाणीचा निचरा न झाल्याने हे पाणी जमिनीखालून विहिरीच्या पाण्यात जाऊन मिसळल्याचा दावा जोशी यांनी केला आहे. त्यामुळे या विहिरीतील माशांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *