‘मांसाहार कराल तर विनाशाकडे जाल’

मुंबईतील कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज कॉलनी आणि परिसरात शेकडो जणांनी काल रॅली काढून मांसाहाराला विरोध केला. ‘मांसाहार करणाऱ्यांनो, लाज बाळगा’, अशी घोषणाबाजी रॅलीत करण्यात आली. याआधीही अनेक ठिकाणी शाकाहाराच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आल्याचा दावा रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी केला.

मेरठमधील बाबा जयगुरुदेव महाराज यांचे अनुयायी असल्याचे रॅलीतील लोकांनी सांगितले. त्यांनी ध्वनिक्षेपकावरून ‘मांसाहार करणे पाप आहे, त्यामुळे मानवता नष्ट होत असून विनाशाकडे जाल’, अशा घोषणा दिल्या. आमच्या संघटनेचे महाराष्ट्रातच १० हजारांहून अधिक लोक आहेत. लोकांनी मांसाहार आणि दारू पिणे सोडून द्यावे, असा आमचा या रॅली काढण्याचा हेतू आहे, असे सुशील सिंह यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. ‘एखाद्याने अन्य कोणत्या जीवाला हानी पोहोचवल्यास त्यांचा विनाश अटळ आहे आणि हेच सत्य आहे. पाश्चात्य लोकही शाकाहाराला पसंती देत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले. आम्ही खूपच शांततेने रॅली काढून जनावरांची कत्तल करू नका, तसेच त्यांना कोणताही त्रास देऊ नका, असे आवाहन लोकांना करतो, असेही ते म्हणाले.

भीतीने मासळी विक्रेत्या निघून गेल्या

रॅलीसाठी परवानगी घेतल्याचे सांगण्यात येते. रॅलीनंतर हे लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्या भीतीने अनेक दुकानदारांनी अंड्यांचे क्रेट लपवले. रस्त्याच्या बाजूला मासळी विकणाऱ्या महिला तेथून निघून गेल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *