त्र्यंबकेश्वरमध्ये रोखला बालविवाह

त्र्यंबकेश्वर शहरामध्ये एका धर्मशाळेत सुरू असलेला बालविवाह चाइल्ड लाइनच्या मध्यस्थीने रोखण्यात आला. बालविवाह कायद्याबाबत, तसेच त्यामुळे होणाऱ्या कारवाईबाबत मुलीच्या पालकांना, तसेच उपस्थित वऱ्हाडींना समजावण्यात आल्यानंतर हा विवाह आता पुढील वर्षी निश्चित करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वरमधील एका आदिवासी कुटुंबातील १७ वर्षांच्या मुलीचा विवाह दिंडोरी तालुक्यातील मुलाशी ठरले होते. विशेष म्हणजे हा आंतरजातीय विवाह होता! मात्र, हा बालविवाह असल्याची माहिती चाइल्ड लाइनपर्यंत पोहोचली. यात मुलीचे वय १७ असल्याचे समोर आले. घटत्या संख्येमुळे योग्य उपवर नसल्याने अनेक विवाहेच्छू तरुण मिळेल ते स्थळ स्वीकारत आहेत. त्याचाच हा एक भाग असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्र्यंबकेश्वरमधील एका धर्मशाळेत शुक्रवारी हा विवाह होणार होता. मात्र, चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी विवाह होण्यापूर्वीच मुलीच्या पालकांची भेट घेतली. त्यांना बालविवाह, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, कायदा आणि कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई याची माहिती दिली. चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी केलेल्या समुपदेशनानंतर मुलीच्या पालकांना त्यांची चूक उमगली. मुलगी १८ वर्षांची झाल्याशिवाय आता लग्न होणार नाही, असा ठाम निश्चिय पालकांनी बोलून दाखवत दोन पावले माघार घेतली.

त्र्यंबकेश्वर येथील घटनेबाबत स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले असून, त्यांनी सर्वांचे म्हणणे रेकॉर्ड करून घेतले आहे. मुलांचे हक्क, समस्या तसेच बालविवाहाबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी चाइल्ड लाइनच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

– मच्छिंद्र विंचूरकर, चाइल्ड लाइन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *