आजपासून तीन दिवस पुस्तकांचे गाव बंद!

या आठवड्याच्या शेवटी तुम्ही पुस्तकांच्या गावाला भेट देण्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या गावात पर्यटकांना गुरुवारपासून पुढचे तीन दिवस ‘प्रवेश बंद’ आहे. भिलार येथील जननी देवीची यात्रा नवमीपासून सुरू होत असल्याने या कालावधीत आठ ते दहा हजार यात्रेकरू गावाला भेट देतात. यात्रेकरूंच्या गर्दीमुळे पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने पुस्तकांच्या गावी येऊ नये, असे आवाहन भिलारवासियांनी केले आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी यासंदर्भात माहिती दिली.

प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या शनिवार, रविवारमुळे अनेकांनी पुस्तकाच्या गावाला भेट देण्याची योजना आखली असेल, हे लक्षात घेत भिलारवासियांनी हे आवाहन केले आहे. लागून आलेल्या सुटीदरम्यान महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी गजबजून जाते. हे पर्यटक पुस्तकांच्या गावाला आवर्जून भेट देतात.

या गावाने अल्पावधीतच पर्यटकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. सध्या पर्यटन आणि सहलींचा कालावधी असल्याने पुस्तकांच्या गावी रोज हजाराहून अधिक पर्यटक भेट देत आहेत. प्रजासत्ताक दिनीही अनेक पर्यटक येण्याची शक्यता होती, मात्र यात्रेसाठी झालेल्या गर्दीमुळे या पर्यटकांचा पाहुणचार, पुस्तकांच्या गावाची ओळख आणि पुस्तकांची ओळख करून देणे शक्य होणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारला विनंती करून तीन दिवसांसाठी हा प्रकल्प बंद ठेवण्याची विनंती केल्याची माहिती सरपंच वंदना भिलारे यांनी दिली.

जननी देवीची यात्रा नवमीपासून सुरू होते. मात्र यात्रेसाठी सर्वाधिक गर्दी २७ जानेवारी रोजी होईल. या दिवशी गावात रस्त्यांवरही दुतर्फा यात्रेकरूंच्या गाड्यांची गर्दी असेल. त्यामुळे पर्यटकांनी या गर्दीचा भाग होऊ नये, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *