रविवारी पहाटे २.३० वाजता सीआरपीएफ कँम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात ५ जवान शहीद झाले होते. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. दहशतवादी अचानक हल्ला करणार असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यामुळे आमचे जवानही तयार होते. जवानांनी मंझूर अहमद बाबा (पुलवामा) व फरदीन अहमद खांदय (त्राल) या दोन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती सीआरपीएफच्या सूत्रांनी दिली. सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात रविवारी पहाटे केलेल्या या हल्ल्यात कॅप्टन शरीफ-उद-दीन गनाई, तौफिल अहमद, राजेंद्र नैन, प्रदीपकुमार पडा आणि निरीक्षक कुलदीप रॉय शहीद झाले होते.
जैश-ए-मोहम्मदने २०१६ मध्येही पठाणकोट एअरबेसवर नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ जवान शहीद झाले होते. सुमारे ८० तास ही चकमक सुरू होती.
