मुली म्हणतात, शेतकरी नवरा नकोच!

किशोर सावळे, वय ३२… जिल्हा- बुलडाणा…एक कोटी २० लाख रुपये किंमतीच्या जमिनीचा मालक…उच्चशिक्षित…चार वर्षे झाली लग्नासाठी मुलगी शोधतोय. अजूनही वधूशोध सुरूच आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी लग्नासाठी प्रस्ताव पाठवले, पण लग्नगाठ बांधायला कुणी तयार नाही. शेतकरी असल्यानं मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात.

किशोरनं आतापर्यंत ३० कुटुंबांकडे लग्नाचे प्रस्ताव पाठवले. पण सगळ्यांनीच नकार कळवला. किशोर शेतकरी आहे हेच एकमेव कारण सगळ्यांनी सांगितले. ‘आतापर्यंत अनेक कुटुंबांशी आणि मुलींशी बोललो. सगळ्यांनी शेतकरी असल्याने नकार दिला. शेतकरी नवरा नको, सरकारी नोकरी आणि तोही एखाद्या विभागात शिपाई असला तरी चालेल’, असं अनेक मुलींनी सांगितलं.

किशोर शेती करतो. नैसर्गिक संकटं आली तरी तो शेतीतून महिन्याला २० हजार रुपये कमावतो. पण लग्न करण्यासाठी हे उत्पन्नही पुरेसं नाही. पत्नी शिकलेली असावी, असं किशोरला वाटतं. आता शेती सोडून एखादी नोकरी करावी, असा विचार किशोरनं केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील विश्वास बेलेकर या तरुणाचीही हीच अवस्था आहे. त्याच्याकडे अडीच एकर जमीन आहे. कुटुंबात तो एकटाच मुलगा आहे. शेतकरी असल्यानं अनेक मुलींनी त्याला नकार कळवला. अखेर त्यानं नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशातील तरुण शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे. ‘जे तरुण शेती करतात, त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर तरुण शेतकऱ्यांच्या पिढीला लग्नाशिवाय राहावं लागेल’, असं शेतकरी नेते शिवकुमार यांनी सांगितलं. तर ‘२००१ ते २०११ या कालावधीत ९० लाख तरुणांनी शेती करणं सोडून दिलं. हा आकडा भविष्यात आणखी वाढेल’, अशी भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *