अंबाजोगाईत मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं- पंकजा मुंडे

आगामी काळात अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं.

मराठी साहित्यातील पहिली कविता

अंबाजोगाई शहराला प्राचीन साहित्याचा इतिहास तर आहेच, याशिवाय मराठी साहित्यातील पहिली कविता लिहिणाऱ्या आद्य कवी मुकुंदराज यांची ही कर्मभूमी आहे. म्हणून अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

आद्य कवी मुकुंदराज साहित्यनगरी

मराठवाडा साहित्य परिषद आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आद्य कवी मुकुंदराज साहित्यनगरीत प्रारंभ झाला.

2 दिवसाचं  साहित्य संमेलन

विश्व साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अंबाजोगाईमध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं यासाठीचे ठराव घेण्यात आले आहेत. म्हणूनच हे विद्यापीठ अंबाजोगाईत व्हावं, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. 2 दिवसाचं हे साहित्य संमेलन अंबाजोगाईकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

शहरातून जागर दिंडी

आद्य कवी मुकुंदराज आणि दासोपंतांच्या अंबानगरीत हे साहित्य संमेलन होत असल्याने अंबाजोगाईच्या सांस्कृतिक इतिहासात भर पडणार आहे. यावेळी सकाळी 8 वाजता शहरातून जागर दिंडी काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *