सोलापूरमध्ये मुलींची व पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

दोन मुली व पत्नीची दगडाने ठेचून हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुभाष शामराव अनुसे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी पत्नी व दोन मुलींची हत्या केली.

अधिक माहिती अशी, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील उंबरे गावात सुभाष शामराव अनुसे (वय ३५) हे आपल्या कुटुंबीयांबरोबर राहतात. सुभाष यांचा पत्नी स्वातीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे वारंवार त्यांच्यात वाद होत असत. सोमवारी सांयकाळी सुभाष याने पत्नी स्वाती आणि मुलगी ऋतुजा व कविता यांना घेऊन दवाखान्याला नेतोय असे सांगितले. परंतु, रात्री उशिरापर्यंत ते न परतल्याने सुभाष यांच्या भावाने शोधाशोध सुरू केली. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर सकाळी पोलिसांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर त्यांना वेळापूर उंबरेतील चांडकाची वाडील येथील सुलेवाडी घाटामध्ये लिंबाच्या झाडाला सुभाष यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तर तेथूनच जवळच स्वाती यांचा मृतदेह दिसून आला. स्वाती यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दोन्ही मुलींनाही लिंबाच्या झाडाला फास दिल्याचे आढळून आले.

ही माहिती समजतात अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व पिलीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पवार, मुन्ना केंगार आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *