भारतात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण असल्याची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे. भारतातील क्षयरोगग्रस्तांची संख्या तब्बल २७ लाख ९० हजार असून २०१६ मध्ये ४ लाख २३ हजार जणांना क्षयरोगामुळे प्राण गमवावा लागल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यामुळे भारतातील क्षयरोगाचे भीषण आणि दाहक वास्तव समोर आले आहे.
२०१६ मध्ये जगभरात क्षयरोगाचे १ कोटीहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील ६४ टक्के रुग्ण केवळ ७ देशांमध्ये आढळून आले. यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर इंडोनेशिया, चीन, फिलिपिन्स, पाकिस्तान, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. क्षयरोगाबद्दल पुरेशी जागरुकता नसल्याने रोगाचे निदान होण्यास लागणारा वेळ आणि त्यानंतरही न मिळणारे उपचार यामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद केले आहे. पुरेशी आरोग्य व्यवस्था नसल्याने भारतासारख्या देशांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढते, असे निरीक्षणही संघटनेने नोंदवले.
‘२०१६ मध्ये क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या १ कोटी ४ लाखाने वाढल्याचा अंदाज आहे. मात्र यातील केवळ ६३ लाख जणांना क्षयरोग झाल्याची अधिकृत नोंद उपलब्ध आहे. त्यामुळे अंदाज आणि अधिकृत आकड्यामध्ये ४४ लाखांची तफावत आहे. यातील निम्मे रुग्ण भारत, इंडोनेशिया आणि नायजेरियामध्ये आढळून येतात,’ असे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात म्हटले आहे.
२०२५ पर्यंत देशातून क्षयरोग हद्दपार करण्याची घोषणा भारत सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र तरीही २०१६ मध्ये भारतातील क्षयरोगग्रस्तांची संख्या २७ लाखांवर पोहोचली, असे अहवालातील आकडेवारी सांगते. भारताचा शेजारी असलेल्या चीनमधील क्षयरोगग्रस्तांची संख्या ८ लाख ९५ लाख इतकी आहे. भारतातील २७ लाख क्षयरोगग्रस्तांपैकी १९ लाख ३८ हजार १५८ रुग्ण खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. तर उर्वरित साडे आठ लाख आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात नसल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आले आहे.