सकाळी केलेल्या हृदय शस्त्रक्रियेच्या तुलनेत दुपारी केलेली हृदय शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. हे संशोधन ‘द लँकेट’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.
फ्रान्सच्या लिले विद्यापीठातील संशोधकांनी हृदय शस्त्रक्रिया केलेल्या तब्बल ६०० रुग्णांची पुनर्तपासणी केली. सकाळी दोनवेळा हृदय शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांची प्रकृती ५०० दिवसांनंतर अधिक गुंतागुंतीची होत गेल्याचे आढळून आले, तर दुपारी हृदय शस्त्रक्रिया केलेल्या केवळ नऊ टक्के रुग्णांना हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे, मृत्यू झाल्याचे आढळून आले.
त्याचवेळी सकाळी शस्त्रक्रिया झालेल्या १८ टक्के रुग्णांकडून हृदयाच्या तक्रारी आल्या. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा हृदयविकाराच्या तक्रारी सकाळी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांमध्ये अधिक आढळल्याचे विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड मॉन्टिअॅग्ने यांनी ‘द टेलिग्राफ’ला सांगितले.
जैविक तंत्रामुळेच मानवाच्या हृदयावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे संशोधनात आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले. संशोधकांनी या अभ्यासासाठी ३० जणांच्या हृदयातील काही घटकांच्या चाचण्या केल्या. संशोधकांनी केलेल्या संशोधनात दुपारच्या शस्त्रक्रियेवेळी शरीरातील जैविक घडय़ाळ अधिक कार्यरत असल्याचे आढळून आले. त्याचेच प्रतिबिंब हृदय शस्त्रक्रियेवर पडत असल्याचे आढळून आले आहे.
