पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील पुराची पाहणी करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. याआधी सोमवारी मोदींनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुरामध्ये गंभीर जखमी झालेल्या लोकांना मोदींनी 50 हजार रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये असतील. आसाममधील पूरग्रस्त भागाची मोदी पाहणी करतील तसंच तेथील बचावकार्याचाही मोदींकडून आढावा घेतला जाणार आहे, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील पुराची परिस्थिती लक्षात घेता मोदींकडून एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. याबैठकीत आसामा, अरूणाचल प्रदेश आणि नागालँडमधील मदत कार्याची माहिती घेणार आहेत. या बैठकीत आसामा, अरूणाचल प्रदेश आणि नागालँडचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.
आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावासामुळे तेथिल जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाममधील नद्या धोकादायक पातळीजवळ पोहचल्या आहेत. या पुरात आत्तापर्यंत 83 जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील काही भागातही सतत मुसळधार पाऊन सुरू असून तेथिल जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.
गुजरातच्या पुराची केली हवाई पाहणी
देशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तसेच, पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते. पुरात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. याचबरोबर, केंद्र सरकारकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला 500 कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. उत्तर गुजरातमधील सौराष्ट्र , बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
