ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार भि. दा. भिलारे गुरुजी यांचे आज (बुधवारी) पहाटे पाचच्या सुमारास महाबळेश्वरमधील भिलार येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दुपारी ३ वाजता भिलार येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भिलारे गुरुजी गांधीवादी विचार आणि काँग्रेस पक्षाचे तत्त्वज्ञान प्रमाण मानून हयातभर सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले होते. येथील किसन वीर कारखान्याचे संस्थापक किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यचळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पाचगणीत वास्तव्य असताना नथुराम गोडसेपासून गुरुजींनी त्यांचे प्राण धाडसाने वाचविले होते. महात्मा गांधी यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचे ते साक्षीदार होते. पांचगणीत महात्मा गांधी आले असता प्रार्थनेवेळी त्यांच्यावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नथुरामला पकडून भिलारे गुरुजींनी चोप दिला होता. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या उषा मेहता यांच्या पुस्तकात हा संदर्भ आहे.

