मुंबईतील १७०४ शेतकऱ्यांवर तब्बल ३४२ कोटींचे कर्ज, सरकारही चक्रावले

मुंबई शहर आणि उपनगरातील १ हजार ७०४ शेतकऱ्यांवर तब्बल ३४२ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत शेतीच नसताना कृषी कर्ज कसे देण्यात आले, बँकांनी कर्जवाटपाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ही चलाखी केली नाही ना, असे प्रश्न त्यातून उपस्थित झाले आहेत.

राज्यातील किती शेतकऱ्यांकडे दीड लाख रुपयांपेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त कर्जाची थकबाकी आहे याची आकडेवारी राज्यस्तरीय बँकिंग कमिटीने (एसएलबीसी) राज्याच्या सहकार विभागाला दिली असून त्यात मुंबई शहरात १३८८ शेतकऱ्यांकडे ३०९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे म्हटले आहे. मुंबई उपनगरामध्ये ३१६ शेतकऱ्यांकडे ३३ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी आहे. मुंबई उपनगरात दीड लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ११९ आहे. तर मुंबई

शहरात दीड लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही ६९४ आहे. हे सर्व कर्ज बँक आॅफ इंडिया, देना बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, एचडीएफसी आणि युनियन बँक आॅफ इंडियाने दिलेले आहे. माहिती अशी आहे की मुंबईबाहेर शेती असलेल्या पण मुंबई निवासी असलेल्या काही शेतकऱ्यांना कर्जे दिली गेली असण्याची शक्यता आहे. काही ‘शेतकऱ्यांनी’ शेतजमिनीमध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कारणाखाली कर्जे घेतली का याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. एसएलबीसीने घाईघाईने आकडेवारी दिल्याने काही त्रुटी राहिल्या असल्याचीही शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत शेतकरी आहेत का असा प्रश्न मलादेखील पडला आहे. परंतु कर्जमाफीच्या योजनेच्या लाभार्थ्यांची जी यादी जाहीर करण्यात आली आहे ते प्रस्तावित लाभार्थी आहेत ते सगळेच कर्जमाफीसाठी पात्र आहेत का याची संपूर्ण चौकशी करूनच निर्णय घेतला जाईल.

लाभार्र्थींची जिल्हानिहाय संख्या ही राज्यस्तरीय बँकिंग कमिटीने (एसएलबीसी) दिलेली आहे. त्याची खातरजमा करूनच राज्य शासन दीड लाख रुपयांपर्यंतची थकबाकी माफ करेल, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या

अहमदनगर २००८६९, औरंगाबाद १४८३२२, बुलडाणा २४९८१८,

गडचिरोली २९१२८, जळगाव १९४३२०, लातूर ८०४७३, नागपूर ८४६४५, वर्धा ९९०००, नाशिक १३६५६९, परभणी १६३७६०, रत्नागिरी ४१२६१, सिंधुदुर्ग २४४४७, वाशीम ४५४१७, अकोला १११६२५, बीड २०८४८०,

चंद्रपूर ९९७४२, गोंदिया ६८२९०, जालना १९६४६३, मुंबई शहर ६९४,

नांदेड १५६८४९, उस्मानाबाद ७४४२०, पुणे १८३२०९, सांगली ८९०००, यवतमाळ २४२४७१, अमरावती १७२७६०, भंडारा ४२८७२, धुळे ७५१७४, हिंगोली ५५१६५, कोल्हापूर ८०९४४, मुंबई उपनगर ११९, नंदुरबार ३३५५६, पालघर ९१८, रायगड १०८०९, सातारा ७६०१८, ठाणे २३५०५.

सर्वाधिक लाभार्थी विदर्भात; त्याखालोखाल मराठवाडा

दीड लाख रुपयांपर्यंतची थकबाकी माफ होणार असलेल्या शेतकऱ्यांची विभागनिहाय आकडेवारी बघता सर्वाधिक लाभार्थी हे विदर्भातील आहेत. त्याखालोखाल मराठवाड्याचा क्रम आहे. उत्तर महाराष्ट्राचा (नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव)

तिसरा तर पश्चिम महाराष्ट्राचा चौथा क्रम लागतो. कोकण सर्वात तळाशी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *