मुंबईकरांना डोकेदुखीचा ‘ताप’

मलेरिया, गॅस्ट्रो, व्हायरल तापांच्या साथीमुळे बेहाल झालेल्या मुंबईकरांना आता डोकेदुखीने हैराण केले आहे. ताप नसताना केवळ डोकेदुखी आणि अंगदुखी होत असल्याच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये येत आहेत.

अपुरी झोप आणि पोषक आहाराच्या अभावामुळे शरीरात आवश्यक जीवनसत्वाचा तुटवडा निर्माण झाल्यास प्रामुख्याने झोपेची समस्या निर्माण होते. अतिरिक्त ताण, चहा-कॉफी वा इतर प्रकारच्या व्यसनांमुळेही झोप उडते. उच्च रक्तदाब तसेच मधुमेही रुग्णांमध्येही अनेकदा डोकेदुखीच्या तक्रारी आढळतात. कूपर रुग्णालयातील कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. शशिकांत म्हसाळ हे मात्र या बदलत्या वातावरणामध्ये डोकेदुखी नेमकी कोणत्या कारणांमुळे उद्भवते हे विस्तृतपणे सांगतात. उष्म्यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर हवामानात अचानक बदल होतो. पाऊस थांबला की हवेतील आर्द्रताही वाढते. हेच वातावरण ताप, खोकला वा इतर संसर्गजन्य आजार पसरवण्यासाठी पोषक असते, तसेच ते डोकेदुखीच्या तक्रारी वाढवण्यासाठीही कारणीभूत असते, असे डॉ. म्हसाळ यांनी सांगितले. डोकेदुखीच्या तक्रारी वाढण्याचे आणखी एक कारण ‘सायनस’ हेही आहे, असेही ते म्हणाले.

डॉक्टरांकडे जा साथीच्या आजारांमध्ये ताप आल्यानंतर डोकेदुखी सुरू होते. त्यामुळे घरीच वेदनाशामक गोळ्या घेणे, वाफारे घेण्याचे मार्ग अवलंबले जातात. या घरगुती उपायांनी दोन दिवसांत सर्दी गेली नाही तर तातडीने डॉक्टरांकडे जायला हवे, असा सल्ला कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. अविनाश पवार देतात. डोकेदुखी थांबवण्यासाठी अॅन्ट‌बिायोटिक्स सुरू केली तर त्याचा कोर्स पूर्ण करण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हा कोर्स बंद केला तर त्याचे दुष्परिणाम पुन्हा डोकेदुखीच्याच स्वरूपात सहन करावे लागतात.

ही पथ्ये पाळा…
-गरम, उकळलेले पाणी प्या.
-उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका.
-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
-डोकेदुखीमुळे डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो.
-डोकेदुखीचे नेमके कारण समजून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *