लोणावळ्याला गुन्हेगारीचा विळखा

मावळातील गड-किल्ले, लेण्या व पर्यटनस्थळे ही दारू, हुक्कापार्लर व मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांची केंद्रे बनली आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन हुल्लडबाजी आणि धांगडधिंगा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पर्यायाने परिसरात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी येथील गड-किल्ले, लेण्या व पर्यटन स्थळांचा लौकिक आणि पावित्र्य धोक्यात आले आहे. या परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यास आणि गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

लोणावळा आणि खंडाळा परिसराला निसर्गाचे वरदान लाभले असून, या ठिकाणांना ऐतिहासिक संदर्भही आहेत. येथील प्राचीन व पुरातन कार्ला, भाजे व बेडसे लेणी, शिवरायांनी उभारलेले विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची, कोराईगड हे गड-किल्ले तसेच पवना, वलवण, लोणावळा, भुशी, उकसान, मळवंडीठुले, तुंगार्ली ही जलाशये, टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची, नागफणी (ड्युक्सनोज) ही ठिकाणी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायम पर्यटकांची गर्दी असते.

काही वर्षांपूर्वीपर्यंत या ठिकाणी पर्यटक खरोखरीच निसर्गपर्यटनाचा आनंद घेत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मादक पदार्थांचे सेवन करून या ठिकाणी धांगडधिंगा घालणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व परिसरात दारूच्या पार्ट्या, हुक्का पार्ट्यांचे सर्रास आयोजन होते. भर गर्दीत हुक्का ओढणारी आणि गाडीतील साउंड सिस्टिमवर मोठ्या आवाजात गाणी लावून बेभानपणे नाचणारे पर्यटक या ठिकाणी पाहायला मिळतात. या सर्व ठिकाणी दारूच्या बाटल्या, काचांचा खच, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लासचा खच पडलेला दिसतो. मात्र, या सर्व गोष्टींवर कोणत्याही प्रकारची कडक कारवाई केली जात नाही. मादक पदार्थांच्या अंमलाखालील तरुण मंडळी गैरप्रकार करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीचे लोणावळा केंद्र बनत आहे.

पोलिस कारवाई करणार का?

काही दिवसांपूर्वी सिंहगड कॉलेजच्या श्रुती आणि सार्थक या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाली होती. ज्या पद्धतीने या दोघांची हत्या करण्यात आली ती पद्धत आणि या हत्येमागची कारणे अत्यंत धक्कादायक आहेत. त्यामुळे या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. श्रुती आणि सार्थक या दोघांचा जीव गेल्यावर या परिसरातील गैरव्यवहार समोर येत आहे. हुक्का पार्लरसह अनेक अवैध उद्योग चालणाऱ्या लोणावळ्यात यापुढे तरी कोणाचा जीव जाऊ नये असे वाटत असेल तर पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *