राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला फडणवीस सरकारने तत्वत: मान्यता दिल्यानंतरही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे शेतकरी कर्जमुक्ती अभियान मेळाव्यात थेट मोदी सरकारवर शरसंधान केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील तीन वर्षांत वापरलेले कोट विकले तरी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल’, असा खोचक टोला संजय राऊत यांनी हाणला.
‘कालपर्यंत आपण काँग्रेसला शिव्या घालत होतो, मात्र तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत सत्तेवर बसलेले देखील भयंकर चोर निघाले. गेल्या तीन वर्षांतला हिशेब मागत असल्यानेच शिवसेनेची भूमिका त्यांच्या जिव्हारी लागत आहे’, असे राऊत म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले सगळे चोर आता आहेत कुठे?, गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांना भाजपमध्ये स्थान देण्यात आल्याचं सांगत राऊत यांनी भाजपकडे वाल्याचा वाल्मिकी ऋषी करण्याचं यंत्र आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला.
