१२वीत ९९% मिळाले; आता साधू बनणार!

बारावी परीक्षेच्या निकालानंतर सर्व विद्यार्थी आयुष्याची पुढील दिशा ठरवण्यात, आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यात व्यग्र आहेत. मात्र असे असतानाच गुजरातमधील एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्यांने संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या वर्शील शाहने १२ वीच्या परीक्षेत ९९.९९ टक्के असे घवघवीत यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण त्याला या सर्वांत रस नसून त्याने सर्व मोहमायेचा त्याग करून संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्याच्या पालकांनीही या गोष्टीला संमती दिली आहे. ८ जून रोजी सूरतमध्ये दीक्षा समारंभ होणार असून सर्व कुटुंबीय त्याच तयारीत मग्न आहेत.

मूळचे पालदी येथे राहणारे जिगर शाह आयकर विभागात कार्यरत असून त्यांनी मुलगा वर्शीलचा हा निर्णय स्वीकारला आहे. मी, माझी पत्नी व दोन्ही मुलांचा पहिल्यापासूनच अध्यात्माकडे ओढा आहे. शाळेला सुट्टी लागल्यावर कुठेही फिरायला जाण्याऐवजी वर्शीलला सत्संगासाठी जाणं आवडत असे. त्यादरम्यानच त्याची अनेक जैन मुनी आणि संन्याशांशी भेट झाली. त्यांच्यातील अनेकजण डॉक्टर, इंजिनिअर आणि सी.ए होते, पण संन्यासी बनल्यावरच त्यांना जीवनाचा खरा आनंद मिळाला.

‘केवळ माझ्या इच्छेखातर वर्शीलने खूप मेहनत करून १२ वीच्या परीक्षेची तयारी केली. आता एवढे उत्तम गुण मिळूनही त्याने शाळेत जाऊन निकाल आणलेला नाही’ असे जिगर यांनी नमूद केले. इतर आई-बापांप्रमाणेच जिगर शाह आणि त्यांच्या पत्नीने वर्शीलच्या भविष्याबाबत अनेक स्वप्न रंगवली होती. त्यामुळे त्याच्या संन्यासी बनण्याच्या निर्णयामुळे ते थोडे उदास आहेत. आत्तापर्यंत त्यानं आमच्याकडं काहीच मागितलं नाही. त्यामुळं त्याची (संन्यासी बनण्याची) एकमेव इच्छा पूर्ण करता आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. या निर्णयामुळे तो खुश राहील आणि त्यातच आम्हाला आनंद मिळेल,’ अशी भावना शाह कुटुंबाने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *