मुलींनो दहावी पास व्हा आणि मिळवा 10 हजारांचं बक्षीस

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातील मुलींचं मनोधैर्य वाढवणारी खास योजना जाहीर केली आहे. तेथे दहावी पास होणाऱ्या मुलींना दहा हजार रूपयांचं बक्षीस योगी सरकारकडून दिलं जाणार आहे. उत्तर प्रदेशचे
उप-मुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. शनिवारी सीबीएसई बोर्डाचा निकाल  जाहीर झाला होता पण उत्तर प्रदेश बोर्डाचा निकाल येणं अजून बाकी आहे. याच पार्श्वभूमिवर बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा 90.95 टक्के सीबीएसई बोर्डाचा निकाला लागला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाच टक्क्यांनी निकालात घसरण झाली.
यंदा मार्च 9 ते एप्रिल 10 या कालावधीत दहावीची परीक्षा झाली होती. पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने परीक्षा घ्यायला नेहमीपेक्षा उशीर झाला होता. उशीर झालेल्या परीक्षेमुळे निकाल यायलाही उशीर होतो आहे.
याआधी उत्तर प्रदेश सरकारने गरीब मुस्लीम कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी मदत जाहीर केली होती. ‘योगी आदित्यनाथ यांनी अल्पसंख्यांक समूदायात असणाऱ्या गरीब कुटुंबातील  मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याला संमती दिली आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात आम्ही या नव्या योजनेची आखणी केली असल्याचं’, अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री मोहसीन रझा यांनी सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सोमवारी पंचेचाळीसाव्वा वाढदिवस होता. त्यासाठी आयोजीत एका कार्यक्रमात दहावीची परीक्षा पास करणाऱ्या मुलींना दहा हजार रूपये बक्षीस देण्याचं जाहीर करण्यात  आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *