रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत असून दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात ४० मि.मी., तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात १२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीतील राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड तालुके तसेच सिंधुदुर्गातील बहुतांश तालुक्यांत पावसाचा जोर दिसत आहे. दरम्यान, आंबा बागायतदारांना या पावसामुळे मोठं नुकसान सोसावं लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्याच पावसाने तारांबळ उडवली आहे. शहरातील बाजारपेठेत दोन ते अडीच फूट पाणी भरले असून दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. घाऊक व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजापूरमध्ये संरक्षक भिंत कोसळून काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
रत्नागिरीत एस.टी. बस स्थानकाकडे जाणाऱ्या एका एस.टी. बसने पाच दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात काही जण जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रायपाटण येथे धावत्या ट्रकवर झाड कोसळल्याने एक जण ठार झाला.