पावसाळा तोंडावर, घरात चूलही पेटवण्याचा प्रश्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निलंग्यातील ज्या घरांवर हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली त्या कांबळे कुटुंबीयांसमोर सध्या रोजच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.आता पावसाळा तोंडावर आहे. दररोज वाऱ्या-पावसाचे वातावरण दाटून येत आहे. घरावर छत नाही तर मग करायचे काय, असा प्रश्न भरत कांबळे यांना पडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाच दिवसांपूर्वी निलंग्यात आगमन झाले. येथील कामांचे उद्घाटन आदी कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला निघत असताना काही क्षणातच त्यांचे हेलिकॉप्टर घरांवर जाऊन कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी सुरक्षित राहिले. मात्र, जेथे हेलिकॉप्टर कोसळले त्या भरत कांबळे यांच्या घराच्या भिंती पडल्या. चार सदस्य जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, भिंती पडल्यामुळे स्वयंपाक कुठे बनवायचा, असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षिततेचे कारण देत काडीपेटीची काडीही ओढायची नाही, अशी सूचना केली आहे. परिणामी दवाखान्यातील जखमींसह घरातील सदस्यांच्याही जेवणाचा प्रश्न कांबळे कुटुंबीयांसमोर उभा आहे. धान्य असूनही स्वयंपाक तयार करता येत नाही. आता तर पावसाळा तोंडावर आला आहे. सध्या वारे, पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. अशा परिस्थितीत काय करायचे, जेवण कुठे शिजवायचे, असा प्रश्न भरत कांबळे कुटुंबीयांना पडला आहे.
खास बाब म्हणून भरपाईसाठी विनंती
– संभाजीराव पाटील निलंगेकर, पालकमंत्री, लातूर