महाराष्ट्रात 15 टक्क्यांनी घटलं मद्यसेवनाचं प्रमाण

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावर मद्यविक्री करायला सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीचे चांगले परिणाम महाराष्ट्रात दिसू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रात मद्यसेवनाचं प्रमाण 15 टक्क्यांनी घटलं आहे. 2016 आणि 2017 मधील आकडेवारी पाहता राज्यात मुंबई आणि ठाणे वगळता इतर शहरांमध्ये मद्यसेवनाचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
यासंबंधी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पुणे, नाशिक आणि कोल्हापूर भागात मद्यसेवनाचं प्रमाण अत्यंत कमी झाल्याचंही सर्व्हेत नमुद करण्यात आलं आहे. दारू पिऊन गाडी चालवण्यानं होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता सुप्रीम कोर्टानं राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारुची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 31 मार्च रोजी महामार्गालगतची दारूची दुकानं आणि बार बंद करा, असा थेट आदेश न्यायालयाने दिला होता.
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगत एकुण 25,560 दारूची दुकानं तसंच बार आहेत, त्यापैकी 15,306 दारूची दुकानं आणि बार कोर्टाच्या आदेशानंतर बंद झाल्याची माहिती आहे.
राज्यातील महामार्ग  आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देणं बंद करा, असा महत्वपुर्ण आदेश  सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिला होता. त्यामुळे १ एप्रिलपासून हायवेवर मद्यविक्री पुर्णपणे बंद झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *