देशातील भाजपशासित राज्यांत करण्यात आलेली गोमांस बंदी हळूहळू सक्तीच्या शाकाहारापर्यंत येऊन पोहोचते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातच्या काही शाळांच्या निर्णयावरून तरी तसे संकेत मिळत आहेत. अहमदाबाद शहरातील दहा शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना डब्यातून मांस, मासे व अंडी आणण्यास बंदी घातल्याचं समोर आलं आहे. तर, अन्य काही शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी भीतीपोटी स्वत:हूनच मुलांना डब्यात मांसाहारी पदार्थ देणं बंद केलं आहे.
‘अहमदाबाद मिरर’च्या प्रतिनिधींनी अहमदाबादेतील २० शाळांतील विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या सवयी व त्याबाबतच्या नियमांबद्दल माहिती घेतली. त्यातून काही शाळांचा मनमानी कारभार समोर आला. वीसपैकी १० शाळांनी मांसाहाराला पूर्ण बंदी केली आहे. उरलेल्या दहापैकी सहा शाळांनी कोणतीही लिखित व तोंडी सूचना केलेली नाही. मात्र, या शाळा जैन वा हिंदू विश्वस्तांकडून चालवल्या जातात. तिथं आपला मुलगा एकटा पडू नये, त्याला सापत्न वागणूक मिळू नये, म्हणून या शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनीच मांसाहारी पदार्थ न देण्याचा निर्णय घेतला आहे. २०पैकी फक्त चार शाळांमध्ये मुलांना सर्व प्रकारचे पदार्थ आणण्याची मुभा असल्याचं आढळून आलं.
आरोग्यासाठी हितकारक असलेल्या कुठल्याही अन्नपदार्थाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, असं मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयानं याआधी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी अहमदाबादच्या शाळांमध्ये शाकाहाराचाच बोलबाला आहे. रचना स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका मुस्लिम विद्यार्थ्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांनी डब्यात काय आणावं याविषयी आमच्या शाळेकडून कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. मात्र, ही शाळा जैनांची आहे व बहुतांश मुलं जैन व हिंदू आहेत. अशा परिस्थितीत आमचं मूल एकाकी पडू नये म्हणून डब्यात आम्ही मांस, मटण देत नाही.’