मोबाइलच्या प्रकाशात अन्त्यविधी उरकण्याची वेळ

तुळींज स्मशानभूमीत वीज नसल्याने गैरसोय

वसई-विरारच्या नागरिकांना अन्त्यसंस्कारही मोबाइलच्या प्रकाशात करावे लागत आहेत. तुळींज स्मशानभूमीत दिवाबत्तीची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी अन्त्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे.

नालासोपारा पूर्वेकाडील तुळींज येथे जुनी स्मशानभूमी आहे. स्मशानात अनेक गैरसोयी आहेत. हातपाय धुण्यासाठी नळाची व्यवस्था नाही, बसायला जागा नाही. त्यातही कहर म्हणजे विद्युत मीटर असूनही दिवाबत्तीचीही सोय नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी अन्त्यसंस्कार करता येत नाहीत. तातडीने ज्यांना रात्रीच्या वेळी अन्त्यसंस्कार करावे लागतात त्यांची यामुळे मोठी अडचण होते. अनेकदा मयत व्यक्तीचे नातेवाईक मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात अन्त्यविध पार पाडतात. यामुळे रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांची गैरसोय दूर केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कोटय़वधी रुपयांची तरतूद

वसई-विरार महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदीत स्मशानभूमीसाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षांत १० कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षांत १२ कोटी ५ लाख ९६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोटय़वधी रुपयांची तरतूद असताना हे पैसे जातात कुठे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. ही जागा वनखात्याच्या जागेत असल्याने ती विकसित करण्यात अडचणी येत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *