दहिसरमध्येऑनर किलिंग

बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या कुटुंबीयांनी चेंबूर येथील ३२ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ब्रिजेश गुप्ता असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
चेंबूरच्या टिळकनगर परिसरात राहणाऱ्या ब्रिजेशचे त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबध होते. मात्र दोघांच्या प्रेमाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने एप्रिल, २०१६ मध्ये दोघांनी कोणालाही माहिती न देता, विवाह करून टिळकनगर परिसरात संसार थाटला. याची माहिती मुलीच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला जबरदस्तीने गावी नेले आणि तिचे लग्न लावून दिले. मात्र मुलीने तेथून पळ काढून ती पुन्हा गुप्ताजवळ येऊन राहिली. त्यानंतर दोघेही उत्तरप्रदेश येथील ब्रिजेशच्या गावी राहू लागले. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर दोघांनी वडाळ्यात नव्याने आपला संसार थाटला. याची कुणकुण मुलीच्या कुटुंबाला लागली. त्यावेळी मुलीच्या भावाने ब्रिजेशला गाठून दोघांचे थाटामाटात लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले, त्यावेळी मुलीच्या भावाने खरेदीच्या नावाखाली ब्रिजेशला दहिसरच्या रावळपाडा येथील चुलत भावाकडे नेले.
त्यावेळी मुलीच्या भावाने बहिणीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला. त्याला ब्रिजेशने नकार दिल्याने मुलीच्या कुटुंबातील नागजी पाचा भारवाड(२४), करनाम माका चौहान(२६), करनान लाला भारवाड(२६) आणि राजेश कारमान गोहिल(२८) यांनी चाकू आणि दगडाने मारहाण केली. ब्रिजेश त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत स्वतः कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल झाला. ब्रिजेशला पुढे अधिक उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान ब्रिजेशचा मृत्यू झाला. दहिसर पोलिसांनी चौघांना अटक केली असून या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *