बँकांच्या ४० शाखा एक एप्र‌िलपासून बंद

स्टेट बँकेच्या ५ ‌सहयोगी बँकांच्या विलिनीकरण प्रक्रियेला राष्ट्रीयपातळीवर १ एप्र‌िलपासून सुरुवात होणार असून, त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे ४० शाखा कायमच्या बंद होणार अाहेत. या बँकांतील सुमारे ४००हून अधिक अधिकारी, कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बँकांच्या विलिनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या (एसबीएच) ३२ ते ३३ शाखा बंद होतील. पतियाळा बँकेच्या (एसबीपी) चार ते पाच आणि जयपूर अँड बिकानेर बँकेची (एसबीबीजे) एक शाखा बंद होणार आहे. औरंगाबादला स्टेट बँक ऑफ इंडियाचे मराठवाडा पातळीवरील सर्कल ऑफिस असेल. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये रिजनल ऑफिस आणि लातूर, नांदेड, बीड येथे झोनल ऑफिस असतील. विलिनीकरणाचे एक मोड्युल ऑफिस औरंगाबादमध्ये असेल, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

भागधारकांना एसबीआयचे शेअर्स
एसबीबीजेच्या भागधारकांना दर दहा शेअर्सच्या मोबदल्यात एसबीआयचे २८ शेअर्स दिले जाणार आहेत. एसबीएम (म्हैसूर बँक) आणि एसबीटीच्या (त्रवणकोर बँक) शेअर्सधारकांना दर दहा शेअर्सच्या मोबदल्यात एसबीआयचे २२ शेअर्स दिले जातील. एसबीपी आणि एसबीएचसाठी शेअर्स स्वॅप किंवा रोख रक्कम दिली जाणार नाही. कारण या दोन्हींवर एसबीआयची पूर्ण मालकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *