मडुरा येथे काजू, आंबा बागायतींना आग

मडुरा हायस्कूलनजीक बागेला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच मडुरा रेल्वे स्थानक परिसरातील मडुरा व पाडलोस सीमेवर सुमारे पंधरा एकरहून अधिक काजू व आंबा तसेच अन्य बागायती शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत खाक झाल्या. आगीत सहाहून अधिक शेतकऱ्यांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेहमीप्रमाणेच सावंतवाडी नगरपरिषदेचा बंब पाण्याअभावी निरुपयोगी ठरला. स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी आग सायंकाळी उशिरा आटोक्यात आली. बांदा पोलिसांना कळवूनही उशिरापर्यंत घटनास्थळी भेट दिली नव्हती. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनेचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त झाला नाही.

मडुरा रेल्वे स्टेशननजीकच्या आंबा व काजू बागायतीला शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. भर दुपारची वेळ, सोसाटय़ाचा वारा आणि त्यात वाढलेले गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांना अनंत अडचणी आल्या. आग जोराने पुढे सरकत होती. यात स्थानिक ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडल्यामुळे ग्रामस्थांचा नाराजीचा सूर निर्माण झाला आहे.

स्थानिकांना माहिती मिळताच आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मडुरा प्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, सुधीर गावडे, पिंटु गावडे, पाडलोस शिवसेना शाखाप्रमुख राजू शेटकर, रुजाय फर्नाडिस, गोपाळ करमळकर, पोलीस पाटील नितीन नाईक यांच्यासह संतोष परब, महेश नाईक, निलेश महाले, जगन्नाथ परब, प्रतिमा नाईक, दशरथ देऊलकर, नेल्सन फर्नाडिस, विनायक वालावलकर, राहुल वालावलकर, कुश्तान, नंदू नेमण, उमेश कोळपटे, भारती नाईक, बब्या परब आदींनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत सध्या उत्पन्न देणारी शेकडो काजू व आंबा कलम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ऐन हंगामात लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

या आगीत मृणालिनी भास्कर साळगावकर यांच्या बागेतील सुमारे १२५ आंबा कलमे व ३५० काजू कलमे खाक झाली. तसेच नितीन नाईक, महेश नाईक, जगन्नाथ परब, निलेश महाले, प्रकाश वालावलकर यांच्या बागेतील काजू कलमेही जळाली. १५ एकरहून अधिक क्षेत्रातील हजारो कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. महसूल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा न केल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त होऊ शकला नाही.

सहाहून अधिक शेतकऱ्यांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या लागलेल्या सुमारे पंधरा एकर आगीत काजू-आंब्याच्या झाडांसोबत आइन, किनळ, साग आदी झाडांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. जीवाचे रान करून मोठी केलेली झाडे काही मिनिटांत नष्ट होतात हे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. कर्ज काढून शेती-बागायती करायची त्यात असं नुकसान झाल्यास शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी सरकार पुसणार काय याकडे शेतकऱ्यांसोबत सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

 ऐनवेळी बंबच धोक्यात

सावंतवाडी नगरपरिषदेचा बंब उशिराने घटनास्थळी दाखल झाला. मात्र टाकीत सुमारे २०० लीटर पाणी असल्याने १५ मिनिटातच पाणी संपले. बंबाच्या सभोवती आग लागल्याने ऐनवेळी बंबच धोक्यात आला होता. स्थानिकांच्या मदतीने बंब सुरक्षितस्थळी हलविण्यात आला. नगरपरिषदेच्या गलथान कारभाराबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आग विझविताना एके दिवशी सावंतवाडी नगरपरिषदेचा बंब आगीतून वाचविण्यासाठी दुसरा बंब आणावा लागेल अशा शब्दांत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सायंकाळी उशिरा आग आटोक्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *