शतकी खेळी साकारणा-या कर्णधार स्टीव्हन स्मिथचा (109) विकेट घेऊन भारताने आपल्या मार्गातील मोठा अडसर दूर केला आहे. सकाळच्या सत्रात भारताने मिचेल मार्श, वाडे स्मिथ आणि स्टार्कला बाद करुन ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. पण ऑस्ट्रेलियाकडे आता 400 पेक्षा जास्त धावांची आघाडी असून त्यांनी दुस-या कसोटीवर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
रविंद्र जाडेजाने दोन तर, उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला. तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर मिचेल मार्शच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला. 31 धावांवर मार्शला रविंद्र जाडेजाने यष्टीरक्षक सहाकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला असला तरी, त्यांच्याकडे 325 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. दुस-याच दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली पकड घट्ट केली.
ऑस्ट्रेलियन संघाला लवकरात लवकर बाद करुन मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचे भारतासमोर लक्ष्य आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 260 धावा केल्यानंतर भारताचा पहिला डाव 105 धावांवर संपुष्टात आला. कुठल्याही चर्चेत नसलेला डावखुरा फिरकीपटू स्टीव्ह ओकेफीने अवघ्या ३५ धावांत ६ बळी घेत भारताच्या डावाला खिंडार पाडले.
