राज्यातील पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली असून मतदानास संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अहमदनगरमधील पांगरमल येथे बनावट दारूमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला आहे.
दरम्यान आजच्या निवडणुकीतून ग्रामीण भागातील जनतेचा कौल स्पष्ट होईल. आज जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली येथील एकूण २, ५६७ जागांकरिता ११, ९८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २४, ०३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान करता येणार आहे. ‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये यावेळी राज्यपातळीवर कोणत्याच पक्षांची आघाडी आणि युती झाली नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत.
दरम्यान जळगावमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानास सुरुवात झाली असून ६७ गटांसाठी २५६ तर १३४ गटांसाठी ५२० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर लातूर जिल्ह्यात १४९९ मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू झाले आहे. जि. प. च्या ५८ गट आणि दहा पंचायत समितीच्या ११६ गणासांठी मतदान होत असून जि. प. ला २३१ उमेदवार तर पंचायत समितीला ४२४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.