लातूरमध्ये ऑईल कंपनीत टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी सोमवारी रात्री घडली. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरु झाली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांने दिली.
लातूर एमआयडीसीमध्ये किर्ती ऑईल मिल ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये खाद्य तेलाचे उत्पादन केले जाते. उत्पादन प्रक्रियेदरम्यान निघणारे टाकाऊ द्रव्य एका टाकीत जमा केले जायचे. त्याच्यावर प्रक्रीया केल्यानंतर ते बाहेर सोडले जायचे. यासाठी कंपनीच्या आवारात सहाशे चौरस फूटाची आणि २० फूट खोल अशी टाकी तयार करण्यात आली होती. दरमहिन्याला या टाकीची साफसफाई केली जायची. सोमवारीदेखील या टाकीची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी कंत्राटी कामगारांना बोलवण्यात आले होते. संध्याकाळी टाकी साफ करण्यासाठी तीन कामगार टाकीत उतरले. ते बराच वेळ झाले तरी बाहेर येत नसल्याने साफसफाईचे काम घेणारा कंत्राटदार आणि अन्य पाच कामगारही टाकीत उतरले. मात्र तेदेखील बाहेर आले नाही. शेवटी रात्री एका कामगाराला दोरीने बांधून टाकीच्या आत सोडण्यात आले. टाकीत विषारी वायू असल्याचे त्या कामगाराच्या लक्षात येताच तातडीने त्याला बाहेर काढण्यात आले. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. पोकलेन मशिनच्या आधारे टाकीचा काही भाग खोदण्यात आला. टाकीतून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. विषारी वायूमुळेच या सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.