भारताच्या परम या पहिल्या सुपर कम्प्युटरची निर्मिती करणारे प्रसिद्ध वैज्ञानिक विजय भटकर यांची शुक्रवारी नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेकडून भारताला सुपर कम्प्युटरची विक्री करण्यास नकार देण्यात मिळाल्यानंतर भटकर यांनी ‘परम’ या स्वदेशी सूपर कम्प्युटरची निर्मिती केली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे. २५ जानेवारी २०१७ पासून डॉ. भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु असतील. काही दिवसांपूर्वीच सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद सोडले होते. विद्यापीठाच्या तत्कालीन हंगामी कुलगुरू व्हीसी गोपा सभरवाल यांच्या अचानकपणे करण्यात आलेल्या उचलबांगडीच्या मुद्द्यावरून नाराजी दर्शवत जॉर्ज यिओ यांनी कुलगुरूपद सोडले होते. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विद्यापीठाच्या देररेख समितीत सभरवाल यांचा समावेश होता. मात्र, विद्यापीठाच्या नियमांप्रमाणे दुसऱ्यांदा मुदतवाढ न देता सभरवाल यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. या सगळ्या घडामोडींनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून मोदी सरकारने नालंदा विद्यापीठाच्या संकल्पनेचा खेळखंडोबा करू नये, असे म्हटले होते. यापूर्वी २०१५ मध्ये मोदी सरकारने नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू अमर्त्य सेन यांच्या पदाला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता.
दरम्यान, जॉर्ज यांनी कुलगुरूपद सोडल्यानंतर पंकज मोहन यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपद सोपविण्यात आले होते. डॉ. भटकर प्रभारी कुलगुरु पंकज मोहन यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. प्रभारी कुलगुरु पंकज मोहन आणि विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी डॉ. भटकरांचे अभिनंदन करत त्यांना तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. डॉ. भटकरांना यापूर्वी पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात नालंदा विद्यापीठ चांगले काम करेल असा विश्वास विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भटकर यापूर्वी पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन देखरेख समितीचे सदस्य राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या आयटी टास्क फोर्समध्येही त्यांचा समावेश होता.