एटीएममधून फेब्रुवारी अखेर कितीही पैसे काढता येणार ?

नोटाबंदीनंतर आरबीआयनं एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घातली आहे. मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत हीच मर्यादा शिथील होण्याचे संकेत काही तज्ज्ञांनी वर्तवले आहेत. पैसे काढण्यावरील मर्यादा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पूर्णतः उठवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आजमितीस एटीएममधून 10 हजारांपर्यंतची रक्कम काढता येते. मात्र दर आठवड्याला बचत खात्यामधून जास्तीत जास्त 24 हजार रुपये, तर चालू खात्यातून एक लाख रुपयेच काढता येऊ शकतात, असे सूतोवाच आरबीआयनं दिले आहेत. आरबीआय सर्व बँकांच्या एटीएममधून पैस काढण्याची लागू केलेली मर्यादा फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिथील करण्याचे संकेत दिले आहेत. देशातील नोटांचा बाजारातील पुरवठा हळूहळू सुरळीत होत असल्याचं बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांनी पीटीआयला सांगितलं आहे. फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत जवळपास 78 ते 88 टक्के चलन बाजारात येणार असून, पुढील दोन महिन्यात परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास बँकेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

नोटाबंदीचा निर्णयाची घोषणा झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा सुरुवातीला अडीच हजार रुपये इतकी होती. नोटाबंदीला 50 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर म्हणजे 1 जानेवारीला ती 4500 रुपये एवढी करण्यात आली. त्यानंतर आठवड्याभराने ती मर्यादा वाढवून 10 हजार रुपयांपर्यंत नेण्यात आली. 8 नोव्हेंबर 2016ला नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500 रुपयांच्या चलनातील जुन्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर बँकेच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. मात्र आता स्थिती काही प्रमाणात सुरळीत होत असल्याचं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *