तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘जलिकट्टू’ या पारंपरिक खेळावर लादण्यात आलेल्या बंदीविरोधात संपूर्ण तामिळनाडू एकवटले आहे. या खेळावरील बंदी उठवण्यात यावी यासाठी सर्वसामान्यांसून, सेलिब्रिटी ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच आवाज उठवला आहे.
तामिळनाडूत आज बंदची हाक देण्यात आली असून सर्व व्यवहार थंडावले आहेत, तसेच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर या खेळाच्या समर्थनासाठी द्रमुक नेते व खासदार कनिमोझी यांनी चेन्नई एगमोर रेल्वे स्टेशनवर ‘रेल रोको’ केला आहे. या आंदोलनालाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. तसेच अंबूर येथील व्यापा-यांनीही दुकाने बंद ठेवत या खेळावरील बंदीचा निषेध दर्शवला आहे.
पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली बंदी घातली होती. मात्र मोदी सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती. मात्र कोर्टाने ही बंदी कायम ठेवत सरकारला झटका दिला. त्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेून ही बंदी हटवण्याची मागणी केली होती.
ही बंदी उठविण्यासाठीतामिळनाडूतील स्थानिकांनी मोठे आंदोलन पुकारले असून गेल्या आठवड्याभरापासून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. काहींनी कँडल मार्च काढला तर बुधवारी चेन्नई येथील मरीना बीच, मदुराई अशा अनेक भागात आंदोलने करण्यात आली.
सेलिब्रिटींनीही दर्शवला पाठिंबा
जगविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, अभिनेता कमल हासन, क्रिकेटपटू आर.अश्विन, विख्यात संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान या सर्वांनीच जलिकट्टूचं समर्थन केलं आहे.
‘ जलीकट्टू हा खेळ तामिळनाडूचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, अशा शब्दांत विश्वनाथन आनंदने या खेळाच्या आयोजनाला पाठिंबा दिला. मी प्राण्यांच्या हक्कांचे समर्थन करतो पण येथे तो मुद्दा नाही. परंपरा आणि उदरनिर्वाहाच्या साधनाचाही मान राखला गेला पाहिजे’, असेही आनंदने नमूद केले.
तर संगीतकार ए. आर. रेहमान यांनी एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.