भारत हा खरच विविधतेने नटलेला देश आहे. विविध जाती, धर्माची लोक या भारतभूमीत गुण्या गोविंदाने नांदतात. याचाच दाखला द्यायचा झाला तर अलाहबादमध्ये माघ यात्रेत स्थानिक मुस्लिम बांधवांनी गंगेच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेत, तिची साफसाफाई केली.
गंगा ही हिंदूसाठी पवित्र नदी आहे. या नदीची रोज पुजा केली जाते. तिचे धार्मिक महत्त्व असले तरी तिच्या पाण्याने कितीतरी गावांची तहान तिने भागवली आहे. जमीन फुलवली आहे. भारताला ख-या अर्थाने सुजलाम सुफलाम बनवण्यात गंगेचा वाटाही तितकाच मोठा आहे. पण अनेक दशकांपासून सुरू असलेल्या औद्योगिक बदलांचा फटका गंगेला बसला अन् तिच्या प्रदूषणात वाढ झाली. भारत सरकारतर्फे गंगा नदीच्या पात्राला स्वच्छ करत पुनर्जिवीत करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘नमामि गंगे ’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून माघ मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गंगा नदीचा काठी उपस्थिती लावली. साहाजिक या माघ यात्रेत नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले. तेव्हा अलाहाबादमधली स्थानिक मुस्लिमांनी पुढाकार घेत गंगा स्वच्छतेसाठी हातभार लावला. स्थानिक मुस्लिम बांधवांनी हातात झाडू घेत पात्रातील कचरा आणि इतर निर्माल्ये साफ करण्यास मदत केली. तसेच गंगेतील प्रदूषण दूर व्हावे यासाठी दुआही मागितली.
माघ मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात साधू, संत आणि भाविक येथे जमले होते. पण गंगा पात्रातील प्रदूषण बघून त्यांनीही नाराजी व्यक्त केली. यावेळी येथील स्थानिक मुस्लिम बांधवांनी नदी पात्रात उतरून गंगेच्या स्वच्छतेला हातभार लावला. याआधी काही विदेशी नागरिकांनी देखील गंगेच्या सफाईसाठी हातभार लावला होता.