गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईसह राज्याला हुलकावणी देणारी थंडी आता मात्र आठवडाभर राज्यभरात मुक्काम ठोकणार आहे. त्यामुळे नवीन वर्षांचे स्वागत थंडीने कुडकुडतच करावे लागणार आहे! उत्तर भारतात निर्माण झालेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम असेल. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात रविवारी मोसमातील पहिल्या हिमवृष्टीची नोंद झाली.
वरदा वादळामुळे मध्यंतरी वातावरणात उष्मा निर्माण झाला होता. परंतु आता गेल्या आठवडय़ापासून थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली असून येता संपूर्ण आठवडा थंडी राज्यात ठाण मांडून राहील. उत्तरेतील थंडीचा प्रभाव दोन दिवसांनी ओसरला तरी लगेचच, २८ डिसेंबर रोजी पुन्हा पश्चिमेचे थंड वारे येण्याचा केंद्रीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे त्यापुढील तीन ते चार दिवस देशाच्या उत्तर भागासह महाराष्ट्रातही थंडीचा कडाका जाणवणार आहे.
पारा घसरला..
- रविवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात (७.६ अंश सेल्सिअस) झाली
- पुणे, नाशिक, सांगली, सातारा, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअसदरम्यान राहिले
- मुंबईतील तापमानातही घसरण झाली असून पारा १६ अंशांवर स्थिरावला
