रिझर्व्ह बँकेने ‘या’ खात्यांवर आणले निर्बंध, पॅन कार्डशिवाय मिळणार नाहीत पैसे

काळा पैसा लपवण्यासाठी बँकिंग प्रणालीचा दुरूपयोग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर रिझर्व्ह बँकेने लगाम लावण्यास सुरूवात केली आहे. पॅन कार्ड नसलेल्या ज्या बँक खात्यामध्ये पाच लाखांहून अधिक रक्कम जमा आहे, आणि ९ नोव्हेंबर नंतर या खात्यात दोन लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली असेल. तर अशा खात्यांमधून पैस काढण्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे.
अशा खात्यांना पॅन कार्ड क्रमांक दिल्याशिवाय किंवा अर्ज क्रमांक ६० (ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही. त्यांनी हा अर्ज भरायचा असतो.) भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे रिझर्व्ह बँकेने अधिसूचनेत म्हटले आहे.

एखाद्या छोट्या खात्यात वार्षिक एक लाख रूपये जमा करण्याची मर्यादा असलेल्या खात्यातूनही महिन्याला १० हजार रूपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच अशा खात्यातूनही १० हजार रूपयेच काढता येणार आहेत.
काही ठिकाणी बँकांनी ‘ग्राहकांना’ जाणून घ्या (केवायसी) या नियमाचे पालन केले नसल्याचे रिझर्व्ह बँकेला दिसून आले आहे. केवायसी असलेल्या खात्यांतील ग्राहकांची पडताळणी करण्यात आलेली आहे. गैर बँकिंग सेवा (एनबीएफसी) पुरवणाऱ्या संस्थांनी सर्व व्यवहारांसाठी पॅन कार्ड किंवा अर्ज क्रमांक ६० घेणे बंधनकारक असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. जोपर्यंत ग्राहकांकडून या नियमांची पूर्तता केली जात नाही. त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास किंवा दुसरीकडे पाठवण्यास प्रतिबंध घालण्यास सांगितले आहे.
नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर अनेक बँक खात्यांमध्ये लाखो, कोट्यवधींची रक्कम जमा झाली होती. यामध्ये अनेक अशी खाती होती की ज्यात गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही व्यवहार होत नसत. सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर मात्र अचानकपणे यामध्ये मोठ्याप्रमाणात पैसे जमा करण्यात आले. अशा पैशांचा स्त्रोत शोधून काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतल्याचे समजते. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे मात्र अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *