जयललितांच्या निधनामुळे सर्वसाधारण सभा रद्द

डॉप्लर रडार बसवण्यासाठी मंजुरी देण्याकरिता ८ डिसेंबर रोजी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्याने रद्द केल्याचे महापालिकेने उच्च न्यायालयाला सांगितले. महापालिकेच्या या अजब कारणावर उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत, नगरसेवक जयललितांच्या अंतिम संस्कारासाठी तामिळनाडूला गेले होते का, असा उपरोधिक टोलाही महापालिकेला लगावला.

महापालिका आयुक्तांनी डॉप्लर रडार बसवण्यासाठी गोरेगाव येथील एक जागा हवामान विभागाला देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सर्वसाधारण सभेच्या मंजुरीशिवाय या जागेवर शिक्कामोर्तब होऊ शकत नसल्याने, गेल्या सुनावणीत आयुक्तांनी ८ डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. महेश सोनक यांच्या खंडपीठाला दिले होते.

गुरुवारच्या सुनावणीत महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील एस. यू. कामदार यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे निधन झाल्याने, ८ डिसेंबर रोजी होणारी सर्वसाधारण सभा रद्द केल्याची माहिती खंडपीठाला दिली.

महापालिकेच्या या अजब उत्तरावर उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. ५ डिसेंबरला जयललितांचे निधन झाल्यावर, तुमचे (महापालिका) नगरसेवक त्यांच्या अंतिम संस्कारांसाठी तामिळनाडूला गेले होते का, अशा विचारणाही उच्च न्यायालयाने केली.

त्यावर अ‍ॅड. कामदार यांनी सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार असल्याची माहिती खंडपीठाला दिली.

पावसामुळे मुंबई वारंवार ठप्प होत असल्याने हवामान खात्याने अचूक अंदाज वर्तवण्याचा आदेश द्यावा, यासाठी व्यवसायाने वकील असलेले अटक दुबे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

२००५ च्या महाप्रलयानंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने, मुंबईत आणखी एक डॉप्लर रडार बसवण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानुसार, हवामान खात्याने डॉप्लर रडार बसवण्यासाठी मुंबईत तीन जागा शोधल्या होत्या, परंतु महापालिकेने त्या जागा हस्तांतरित करण्यास नकार दिल्याने, डॉप्लर बसवण्याचे काम खोळंबले होते. ही बाब निदर्शनास येताच उच्च न्यायालयाने महापालिकेला फैलावर घेत, आयुक्तांना दोनदा उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *