नोटांबदीमुळे लोकांना सहन करावा लागणारा त्रास कमी करण्यासाठी मोदी सरकारने पेटीएमची मदत घेतली. नोटाबंदीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी पेटीएमच्या जाहिरातींमध्ये मोदींचे छायाचिदेखील झळकले. गेल्या महिनाभरापासून लाखो लोकांनी पेटीएमच्या सुविधेचा लाभ घेतला. मात्र आता या ऍपमुळे लोकांसोबतच दुकानदारांनाही समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पेटीएमद्वारे पेमेंट करताना अनेक अडचणी येत आहेत. इंटरनेटच्या सहाय्याने पेटीएम सेवेचा वापर करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कॅशलेस इंडियासोबतच डिजीटल इंडियाचादेखील फज्जा उडताना दिसत आहे.
नोटाबंदीनंतर पेटीएम या ई-वॉलेटचा पर्याय देण्यात आला. या वॉलेटमध्ये १० ते २० हजार रुपये ठेवण्याचा ठेवता येतात. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पेटीएमचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मात्र आता पेटीएम वापरकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. नोटाबंदीनंतर अनेक दुकानांबाहेर पेटीएमद्वारे पैसे स्वीकारले जातील, अशी पाटी लावण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होते. मात्र इंटरनेटच्या मदतीने पेटीएमद्वारे पेमेंट करताना अनेकदा लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. पेमेंटच होत नसल्याने ई-वॉलेटमधील हजारो रुपयांचा उपयोग काय, अशी व्यथा पेटीएम वापरकर्त्यांकडून व्यक्त होते आहे.