विदर्भात मोठय़ा संख्येत असलेल्या कुणबी समाजाने फिरवलेली पाठ, नोटाबंदीचा फटका आणि ओसरलेली संतापाची धग यामुळे काल विधिमंडळावर मोठा गाजावाजा करून काढण्यात आलेला मराठा कुणबी मोर्चा लाखाचा आकडा गाठू शकला नाही. राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांमुळे हा मोर्चा दखलपात्र तरी ठरला, अन्यथा संयोजकांची चांगलीच पंचाईत झाली असती.
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व आरक्षण या तीन प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यभरात आतापर्यंत ४६ मोर्चे काढले. लाखोंच्या उपस्थितीमुळे हे मोर्चे सरकारच्या उरात धडकी भरवणारे ठरले. या पाश्र्वभूमीवर विधिमंडळावर निघणारा मोर्चा भव्य असेल या अपेक्षेत सारे असताना उपराजधानीतील हा मोर्चा अपेक्षाभंग करणारा ठरला. पोलिसांच्या अंदाजानुसार या मोर्चात ४० ते ५० हजार लोक सहभागी झाले होते. याआधी याच शहरात २५ ऑक्टोबरला पहिला मोर्चा निघाला होता. त्यात कुणबी समाजाला सामील करून घेण्यास आयोजकांनी नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद अजूनही शमला नसल्याचे काल स्पष्टपणे दिसून आले. विदर्भात तसेच या शहरात मोठय़ा संख्येत असलेल्या कुणबी समाजाने या मोर्चाकडे पाठ फिरवली. या वेळी आयोजकांनी मोर्चाचे नामकरण मराठा कुणबी असे केले व कुणबी समाजातील अनेक संघटनांच्या बैठका घेतल्या, पण गेल्या वेळच्या अपमानामुळे व्यथित झालेला हा समाज मोठय़ा संख्येत मोर्चात सहभागी झाला नाही. उलट या मोर्चात जाऊ नये असे संदेश सर्वत्र पाठवण्यात आले.