ऐन रबी हंगामाच्या काळात सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्याने हवालदील झालेल्या शेतक-यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. शेतक-यांना आता पाचशेच्या जुन्या नोटा देऊन बियाणे खरेदी करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. मात्र खरेदीच्या दरम्यान शेतक-यांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानुसार पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्या आहेत. याचा फटका शेतक-यांनीही बसला होती. ऐन रबी हंगामाच्या काळात नोटाबंदीमुळे पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतक-यांना पडला होता. कर्ज खात्यातून २५ हजार रुपये काढण्याची परवानगी देत केंद्र सरकारने शेतक-यांना दिलासा दिला होता. त्यासोबतच शेतक-यांना पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांच्या मोबदल्यात बियाणे खरेदी करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला केली होती. सुरुवातीला अर्थ मंत्रालयाने ही मागणी फेटाळून लावल्याची चर्चा होती. पण आता केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्विटरवरुन शेतक-यांना पाचशेच्या जुन्या नोटांच्या मोबदल्यात बियाणे खरेदी करण्याची मुभा दिल्याचे जाहीर केले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे चालवण्यात येणा-या बियाणे केंद्रांमध्येच पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येतील. खरेदीसाठी आलेल्या शेतक-यांना त्यांचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. रबी हंगामाच्या काळात शेतक-यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.