देशात नोटा बदलताना नागरिकांचा घामटा निघत असतानाच नोटांची चणचण आणखी तीन आठवडे लागणार आहे, अशी कबुली खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी दिली. जनतेने संयम बाळगावा, त्याचे फायदे देशाच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ मिळतील, असे मधाचे बोटही त्यांनी लावले.
पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा आकार व डिझाईन वेगळे आहे. गुप्ततेच्या कारणामुळे घोषणेपूर्वी या एटीएमची रचना बदलणे शक्य नव्हते. या नोटा एटीएम मशीनमध्ये टाकण्यापूर्वी त्याची रचना बदलणे आवश्यक आहे.
यासाठी हजारो जण काम करत आहेत. देशातील दोन लाख एटीएमची रचना बदलावी लागणार आहे. या कामासाठी तीन आठवडे लागतील, असे जेटली म्हणाले.
पाचशे व हजारच्या जुन्या नोटांची रक्कम १४ लाख कोटी आहे. ही प्रचंड रक्कम बदलण्यासाठी रिझव्र्ह बॅँक व बॅँकेकडे पुरेशा नवीन नोटा आहेत. या प्रचंड मोठया कामावर सरकारचे लक्ष आहे.
सरकारने नोटा बदलण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी दिला असून जनतेने नोटा बदलण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
देशातील सध्या ४० टक्के एटीएम सुरू आहेत. त्यातील रोख रक्कम काही मिनिटांत संपत आहे. पाचशेच्या नवीन नोटा दिल्ली व मुंबईत मिळत आहेत. रिझव्र्ह बॅँकेने १००च्या नोटांचे वाटप सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले.