अशा बदलता येणार नोटा..
अर्थव्यवस्थेत विद्यमान चलनात असलेल्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यानुसार, १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या ५० दिवसांच्या कालावधीत ज्यांच्याकडे या नोटा आहेत त्यांना त्या बँका तसेच टपाल कार्यालयात बदलून देण्याची सोय करण्यात आली आहे. १० ते २४ नोव्हेंबर दरम्यान प्रति दिन ४,००० रुपये बदलून देण्याची सोय आहे. मात्र त्यासाठी वैध पॅन, आधार, मतदान ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत नोटा जमा करू न शकलेल्यांना ३१ मार्च २०१७ पर्यंत पुराव्यासह प्रतिज्ञापत्र रिझव्र्ह बँकेने नियुक्त केलेल्या केलेल्या कार्यालयांमध्ये द्यावे लागणार आहे.
नव्या नोटा जारी
पंतप्रधानांनी सायंकाळी उशिरा चलनातील ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केल्यानंतर रात्रीच रिझव्र्ह बँकेने नव्या ५०० व २,००० रुपयांच्या नोटांचे चित्र जारी केले. प्रत्यक्षात या नोटा १० नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. जारी करण्यात येणाऱ्या नोटांच्या संकल्पचित्रात त्याची वैशिष्टय़े रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केली. याचबरोबर सध्या असलेल्या १, २, ५, १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नव्या स्वरुपातील नोटाही अर्थव्यवस्थेत आणली जाणार आहे.
आज बँका, एटीएम बंद
नव्या ५०० रुपयांच्या व २,००० रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यासाठी बँकाना तयारी करावी लागणार आहे. यासाठी बुधवार, ९ नोव्हेंबर रोजी देशभरातील सर्व बँकांच्या शाखा तसेच एटीएम बंद ठेवण्यात येणार आहेत. ५०० च्या नव्या तसेच २,००० च्या नोटा १० नोव्हेंबरपासून बँका आणि एटीएममध्ये उपलब्ध होतील. मात्र एटीएम दुसऱ्या दिवशीही, गुरुवारी पूर्ण क्षमतेने चालू राहण्याबाबत अडचणी येण्याची शक्यता आहे. एटीएमवर १०० च्या नोटा काढण्यासाठी मंगळवार रात्रीपासूनच गर्दी होऊ लागली आहे. ५०० व १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याच्या धास्तीने बँक ग्राहकांनी एटीएमकडे धाव घेतली. एटीएममधून नोटा काढण्यासाठी सध्या प्रति दिन २,००० रुपयांची तर बँक खात्यातून दिवसाला १०,००० रुपये (आठवडय़ाला कमाल २०,००० रुपये) बंधन आहे.
काय आहे नव्या नोटांमध्ये?
काळ्या पैशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न म्हणून जारी करण्यात येत असलेल्या नव्या २,००० रुपयांच्या नोटांमध्ये ‘एनजीसी’ (नॅनो जीपीएस चिप) तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे. हे चिप सिग्नल रिफ्लेक्टर म्हणून कार्यरत असेल. सॅटेलाईटमार्फत सिग्नल पाठविल्यानंतर ते या चिपद्वारे पुन्हा सॅटेलाईटकडे जाईल. यामध्ये त्या नोटेचा सांकेतिक क्रमांकही सॅटेलाईटपर्यंत पोहोचेल. यामुळे संबंधित नोट कुठे असेल तिचे ठिकाण कळेल. जमिनीच्या अगदी १२० मीटर खालपर्यंत असल्यासही नोटेचा ठावठिकाणा उलगडेल.
चलनातून ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बाद करण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे काळ्या पैशाच्या समांतर अर्थव्यवस्थेवर लक्ष्यभेदी हल्ला आहे. सरकारचा हा एक धाडसी निर्णय म्हणून गणला जाईल.