प्रत्येक १२ मिनिटाला एका गर्भवती महिलेचा गर्भधारणासंबंधित आरोग्य समस्येमुळे मृत्यू होतो. त्यामुळे केंद्र सरकारकडून यासाठी व्यापक उपाययोजना सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेस गर्भवती महिलांची विशेष मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए) अंतर्गत सरकारी आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांची त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत विशेष तपासणी करण्यात येणार आहे.
या तपासणीमध्ये अल्ट्रासाऊंड, रक्त आणि लघवीची तपासणी करण्यात येणार आहे. याच्यासह इतर नियमित चाचण्याही करण्यात येणार आहेत. अतिशय जोखमीच्या गर्भाची तपासणी करणे आणि त्याच्यावर उपाययोजना करणे याच्यासह माता मृत्यू दर कमी करणे, बालमृत्यू दर घटविणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे.
या अभियानाच्या अंतर्गत देशभरातील तीन कोटी महिलांची मोफत तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्यासाठी १८४ जिल्हय़ांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे.
भारत आरोग्य क्षेत्रात जगाच्या तुलनेत चांगली प्रगती करत असला तरीही देशात एक लाख मातांपैकी १६७ मातांचा मुलांना जन्म देताना मृत्यू होतो. गर्भधारणासंबंधित आरोग्य समस्येमुळे प्रत्येक वर्षांला ४४ हजार महिलांचा मृत्यू होतो किंवा प्रत्येक दिवसाला १२० मातांचा मृत्यू होतो, असे युनिसेफचे वरिष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. गगन गुप्ता यांनी सांगितले.