पुर्ववैमनस्यातून देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन सख्ख्या भावांची हत्या करण्याची घटना बुधवारी रात्री उशिरा बदलापूरजवळील वांगणी परिसरात घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
वांगणी येथील वीर सावरकरनगर परिसरात राहाणारे दुधानी कुटुंबीय आणि परिसरातील काही जण देवीच्या मुर्तीचे विसजर्न करण्यासाठी उल्हास नदीवर जात होते. विसर्जन मिरवणूक उल्हास नदीच्या पुलावर आली असताना आझादसिंह कब्जासिंह दुधानी (२२) आणि धनराजसिंह कब्जासिंह दुधानी (२८) या दोघांवर अर्जुन शेट्टी, शिवा आणि अन्य पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. मिरवणुकीत दोघे भाऊ एकत्रित असल्याची संधी साधून त्यांची हत्या करण्यात आली. दोघांवर हल्ला करून ही बाब लक्षात येण्याआधीच आरोपींनी पळ काढला.