‘शिवीगाळ’ करणाऱ्या जानकरांनी अखेर दिलगिरी केली व्यक्त

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अजित पवारांना उद्देशून शिवीगाळ करणाऱ्या भाषेवरून महाराष्ट्रात एकच गदारोळ उठला. अनेक ठिकाणी जानकर यांच्या पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता महादेव जानकर यांनी आपल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केलीय.

एकच गोंधळ उडाल्यानंतर अज्ञातवासात गेलेल्या महादेव जानकरांनी आता मात्र एका पत्राद्वारे ‘आपल्या शब्दांचा विपर्यास केला गेला’ असं म्हणत खेद व्यक्त केलाय. खंडेराया ची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे, तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा. गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते. सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुशीत झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *